गंगथडी……❤️
नारायण खानसोळे सर लिखित नुकतीचं आलेली नवी-कोरी 256 पृष्ठसंख्या असलेली कादंबरी वाचली नि भरून पावलो असं म्हणू शकतो कारण मी ही कादंबरी वाचली नाही तर अक्षरशः जगून आलोय. काही पुस्तकं वाचताना माणूस पानांमध्ये हरवत नाही तर तो मातीत हरवतो. गोदाकाठच्या त्या ओल्या मातीत, बाभुळबनाच्या दाटवाटात, पुराच्या दरडीखाली वसलेल्या वासरी गावाच्या गल्ल्यांमध्ये. नारायण खानसोळे सरांची नवी कोरी कादंबरी गंगथडी वाचताना हेच होतं. ही एका गावाची कथा तर आहेच त्यासोबतच ही एका संपूर्ण कृषी संस्कृतीची जिवंत स्मृती सुद्धा आहे नि ती स्मृती इतकी खरी आहे, इतकी अस्सल आहे की वाचता वाचता आपल्याला आपल्या आजोळच्या रानाचा वास यावा, आजीच्या हातच्या भाकरीची आठवण यावी, गुरांच्या गळ्यातल्या घंटेचा आवाज कानात घुमावा. गंगथडी म्हणजे गोदाकाठची जीवनरीत. गोदावरी आईच्या काठावर, नांदेडच्या खालून, काळ्या मातीच्या वावरांमध्ये जगणाऱ्या माणसांची ही कथा आहे. पण लेखक फक्त माणसांबद्दल लिहित नाहीत ते त्या झाडांबद्दल लिहितात, त्या दरडींबद्दल लिहितात, त्या गंगेच्या पाण्याबद्दल लिहितात जी लेकरं, पाखरं, वासरं, किडे-मुंग्यांची माय आहे. ...