फकिरा....❤️🌼

काही दिवसांपूर्वी 'अण्णाभाऊ साठे' यांच्या अजरामर लेखणीतून निर्माण झालेली 'फकिरा' ही कादंबरी चौथ्यांदा वाचून पूर्ण केली नि त्या कादंबरीचाच एक भाग झालो. ही कादंबरी मी वाचली नाही तर अक्षरशः जगून नि अनुभवून आलो. अण्णाभाऊ नि त्यांच्या लिखाणाला खरंच तोड नाही. "वाचावं नि फक्त वाचतच जावं" असं अफाट साहित्य त्यांनी मराठी साहित्याला दिलं आहे, जे वर्षानुवर्षे वाचकांच्या हृदयात फिट्ट असेल.

35 कादंबऱ्या, 13 कथासंग्रह, 8 पटकथा, 1 प्रवासवर्णन, 3 नाटके, 10 पोवाडे, 14 लोकनाट्ये नि 12 उपहासात्मक लेख एवढं भरमसाठ दर्जेदार लिखाण करून आपल्या समाजाला आरसा दाखवण्याचं काम त्यांनी केलं आहे. आपल्या साहित्यातून त्यांनी उपेक्षित समाजाचं संघर्षमय जीवन वाचकांसमोर मांडलं असून, पावलोपावली शोषणाविरुद्ध आवाज उठवला आहे.

'फकिरा' ही अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली अप्रतिम कादंबरी आहे. 1959 साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीला 1961 मध्ये 'महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार' मिळाला असून अण्णाभाऊंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीस ही कादंबरी अर्पण केली आहे. वि. स. खांडेकर यांची प्रस्तावना लाभलेल्या या कादंबरीच्या वाचनाची वाचकांची ओढ 64 वर्षांनंतरही कमी झालेली नाही, यातच या कादंबरीचं महत्त्व अधोरेखित होतं.

एक उपेक्षित नायकाचं बंडखोर जीवन समाजासमोर आणणारी ही एक महत्त्वपूर्ण कादंबरी आहे, जी प्रत्येकाने आवर्जून वाचायलाच हवी. 'फकिरा' वाचून त्यातून बरंच काही शिकून नि नैतिकता, प्रेम, आपुलकी, सहानुभूती, स्वाभिमान नि माणुसकीचे धडे घेऊन परत यावं असं मला वाटतं!

या कादंबरीत अण्णाभाऊंनी फकिरा नामक वीर तरुणाचं कथानक मांडलं आहे, जो कुठल्याही परिस्थितीत हार मानत नाही. माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या नि ब्रिटिश सत्तेला आव्हान देणाऱ्या या तरुणाची शौर्यगाथा सांगणारी नि माणुसकीचं दर्शन घडवणारी ही उत्कृष्ट कादंबरी आहे. ही कादंबरी आपल्या हृदयाचा ठाव घेते नि सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला गुंतवून ठेवते.

अण्णाभाऊंचं मनोगत:

"ही कादंबरी केवळ माझ्या प्रतिभेने निर्माण केली नाही. प्रतिभेला सत्याचे - जीवनाचे दर्शन नसेल, तर प्रतिभा, अनुभूती वगैरे शब्द निरर्थक आहेत, असा माझा अनुभव आहे. सत्याला जीवनाचा आधार नसला की प्रतिभा अंधारातील आरशाप्रमाणे निरुपयोगी ठरते. जशी प्रतिभेला वास्तवाची गरज भासते, तद्वतच कल्पनेलाही जीवनाचे पंख असणे आवश्यक असते आणि अनुभूतीला सहानुभूतीची जोड नसेल, तर आपण का लिहितो याचा पत्ताच लागणे शक्य नाही."

हा ‘फकिरा’ही माझा होता. जे पाहिलं, अनुभवलं, ऐकलं, तेच मी लिहिलं आहे. त्यातून हा फकिरा निर्माण झाला आहे. ♥️

खरंच! अण्णांनी जे आजूबाजूला पाहिलं, अनुभवलं नि ऐकलं तेच त्यांनी आपल्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. "सत्याला जीवनाचा आधार नसला की प्रतिभा अंधारातील आरशाप्रमाणे निरुपयोगी ठरते," हे त्यांच्या विविध साहित्यातून अधोरेखित होतं.

'फकिरा'च्या कथानकाबद्दल मी जाणून-बुजून जास्त काही लिहिणार नाही, कारण याबद्दल आतापर्यंत बरंच काही लिहिलं गेलं आहे, यावर चित्रपटही आला आहे. आतापर्यंत अनेकांनी ही कादंबरी वाचली नि अनुभवली आहे. त्यामुळे या कादंबरीतलं कथानक वाचकांनी स्वतःच वाचावं नि अनुभवावं, असं मला वाटतं...❤️🌼

 ©️ Bookish Moin 💙

♥️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

We Read आयोजित पत्रलेखन स्पर्धेचा निकाल..🌼

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼