डायरी वगैरे 🌿🖤

1.आपल्या स्वार्थासाठी कोणासोबतही 'मैत्री' किंवा 'प्रेम' करू नका.आपल्या काम नि मतलबपूर्ती मैत्री किंवा प्रेम करायचं आणि मग त्या व्यक्तीला अर्ध्यात सोडून द्यायचं हे असलं अजिबात करू नका.सुरुवातीला प्रेमळ बाता मारून त्याला भुलवायचं, आपलं स्वार्थ पूर्ण करायचं आणि मग निघून जायचं हे फार वाईट आहे.कोणालाही कोणाच्याही भावनेसोबत खेळण्याचा अधिकार अजिबात नाही.तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीसोबत टाईमपास प्रेम/मैत्री करत असाल तर त्याला सरळ सरळ सांगून द्या.तेव्हा त्याला तेवढं दुःख होणार नाही जेवढं पुढे होईल.तुम्ही जरी त्या व्यक्तीला विशेष मानत नसाल पण तो मनापासून तुम्हाला आपला मानत असतो.

तुमच्या आयुष्यात त्याला किंमत नसते पण त्याच्या आयुष्यात तुम्हाला खूप किंमत असते..कोणालाही स्वप्न दाखवू नका,एकट्याला तुमची सोबत देऊ नका आणि जर देत असाल तर कृपया करून त्याचा साथ शेवटपर्यंत सोडू नका.ती व्यक्ती तुमच्यासाठी टाईमपास असेल पण त्याच्या साठी तुम्ही टाईमपास नसता.

एकवेळ आर्थिक लुबाडणूक करा पण भावनिक लुबाडणूक करू नका.हे त्याला सहन होणार नाही.तो/ती आतून तुटून जाईल.पुन्हा कोणावर विश्वास करायला तो 1000 वेळा विचार करणार.✨
__________________________________________

2.अति काळजी,प्रेम नि आपुलकी तेव्हाच ठीक असते जेव्हा समोरच्या व्यक्तीला या गोष्टींची जाणीव किंवा कदर असते.तेव्हा आयुष्याच्या योग्य वळणावर थांबून आपण एकवेळ नक्की विचार करायला हवं की आपण हे सर्व ज्याच्यासाठी करतोय त्या व्यक्तीला खरंच ही जाणीव आहे का ?त्या व्यक्तीला या गोष्टींचा खरंच फरक पडतो का ?कधी कधी अतिप्रेमामुळे आपण आंधळे होऊन जातो, योग्य काय आणि वाईट काय ?हे आपल्याला लवकर कळतं नाही आणि जेव्हा हे कळतं तेव्हा उशीर झालेला असतो.

या गोष्टींची जाणीव लवकरात लवकर होणे हे फार गरजेचं असतं.♥️
__________________________________________

3.माणसाने वेळोवेळी स्वतःला जमेल तसं 'Update' करायला हवं.जमेल तसं स्वतःची 'Improvement' करायला हवी.आयुष्याच्या धावपडीत थोडं थांबून आपण कोठे चुकतोय यावर विचार करून 'Update' व्हायला हवं.प्रत्येक बाबतीतल्या आपल्या कमतरता आपण ओळखून त्या 'Fulfill' करायचं प्रामाणिक प्रयत्न करायला हवं.

शारीरिक असो किंवा मानसिक प्रत्येक बाबतीत माणसाने दिवसागणिक स्वतःमध्ये (Improvement) ही करायलाच हवी.कोणाला आपली सुधारणा दिसण्याचा अट्टहास न ठेवता ती आपल्यापूर्ती तरी करावी.♥️
__________________________________________

4.'Improvement' ही प्रत्येकाची वेगवेगळी असते.आपण स्वतःला किती 'Improve' केलं हे फक्त आपल्या स्वतःलाच समजतं असतं.समोरच्या व्यक्तीच्या दृष्टीने आपण आपली 'Imrovement' बघू शकत नाही किंवा आपण किती सुधारलो हा समोरचा व्यक्ती समजू/ठरवू शकतं नाही.समोरचा 12 तास अभ्यास करतोय आणि आपण सध्या 6 तास करतोय पण पूर्वी हा कालावधी 4 तासच होता आणि आता तो 6  झालाय तर हे 2 तास आपण Improve केले आहे,हे फक्त आपणच समजू शकतो.12 तास अभ्यास करणाऱ्या समोरच्या व्यक्तीला आपल्या या 2 तासाची improvement समजू शकत नाही.
__________________________________________

5.मला कोणत्याही धर्म, जात,पंथ आणि वर्ण वगैरेशी काहीही घेणेदेणे नाही.'समोरचा 'माणूस' असणे व त्याच्यात 'माणुसकी,संवेदनशीलता' असणे एवढंच माझ्यासाठी पुरेसं असतं कायम.आयडिया नाही पण परकं कोणीही वाटतं नाही(अपवाद वगळता).

सर्व समान आणि आपलेच वाटतात.समोरचा आपल्याला प्रेम देतो आपण त्याला दुप्पट प्रेम द्यायचं असा सोपा लॉजिक आहे..क्षणभंगुर असलेल्या आयुष्यात जाती/धर्माच्या नावाने एकमेकांचा द्वेष करत बसायला माझ्याजवळ वेळ नाही.

प्रेम द्यायचं आणि घ्यायचं बस्स !
__________________________________________

6.जेव्हापासून समजलं तेव्हापासून 'प्रेमाला' आजपर्यंत टाईमपास म्हणून कधीही बघितलं नाही."एखाद्याच्या भावनेशी खेळायचं अधिकार कोणालाही नसतो".जोपर्यंत प्रेमाची परिभाषा माहिती नव्हती तोपर्यंत ठीक होतं. पण जेव्हा थोडी अक्कल आली आणि 'प्रेम आणि आकर्षणात' फरक समजू लागला;तेव्हापासून प्रेमाला फक्त एका शुद्ध भावनेच्या नजरेतूनच बघितलं.

कोणावरही प्रेम करायचं तर ते शेवटपर्यंत आणि एकदम हृदयापासून करायचं आणि त्या व्यक्तीला जपायचं हा रुल तेव्हापासूनचं नक्की केलं होतं.कोणत्याही मुलीच्या भावनेशी खेळायचं नाही ही गाठ मनाशी बांधली आणि त्यावर अंमलबजावणी सुद्धा केली.यामुळेच बहुतेक मला हवं तसं प्रेम मिळालं सुद्धा जरी ते परिस्थितीमुळे जपता आलं नाही, तरीही कधीही प्रेमाचं नाव घेऊन टाईमपास केला नाही या गोष्टीचा नेहमी आनंद आहे.

माझी प्रेमाची परिभाषा खूप शुद्ध आहे.
समाज ज्या दृष्टीकोनातून 'प्रेमाकडे' बघतो ते बदलण्याची नक्की गरज आहे.
__________________________________________

7.सोशल मीडियावर लोकांना फक्त एक पॉईंट किंवा मुद्दा हवा असतो.एखाद्याने एखादी पोस्ट केली की सर्वंच त्याच मुद्द्यावर आभाळ हाणायला सुरुवात करतात.आपण मागे सुटता कामा नये याची पुर्णपणे काळजी आपण घ्यायला सुरुवात करतो."प्रत्येक मुद्द्यांवर बोलायला आणि आपलं मत मांडायलाच हवं असं अजिबात जरुरीचं नसतं" असं मला वाटतं.

पूर्वी मी हा विचित्र प्रकार फार करायचो काहीही झालं तर मत मांडून मोकळं व्हायचो.कालांतराने वाचन,समज वाढली आणि Maturity आली आता या गोष्टी मला फार पांचट वाटतात.म्हणूनच मी आता कोणत्याही राजकीय, धार्मिक, सामाजिक मुद्द्यांवर अजिबात आभाळ हानत नाही.

चालू असलेल्या दोन्ही बाजू समजून घेऊन त्यावर एक Neutral मत बनवून मोकळा होतो.
__________________________________________

8.जमेल तसं प्रत्येकाने 'दलित साहित्य'वाचायला हवं.कोण्या एकेकाळी 'अस्पृश्य' म्हणून हिनवल्या गेलेल्या,माणूस असून सुद्धा माणसांचा दर्जा नसणाऱ्या आणि ज्ञान, मान, सत्ता, संपत्ती, संस्कृती आणि सर्वस्व यांच्यापासून अलग केलेल्या या 'माणसांची आत्मचरित्रे वाचून,समजून घ्यायला हवी. आपली सुख-दुःखे आपल्या भाषेत बोलणारे लेखन झाले पाहिजे’, असे विचार बाबासाहेब त्यांच्या वक्तव्यांत मांडत. ‘. 

या ग्रंथांच्या वाचनाने माणसांची झोप उडून जाऊन त्यांची विचारशक्ती जागृत झाली पाहिजे’ असे ते म्हणत. हाच दलित साहित्याचा उगमस्राेत म्हणावा लागेल.

उपरा,अक्करमाशी,बलुतं, उचल्या,आठवणींले पक्षी, बिराड,भंगार आणि इत्यादी असंख्य पुस्तके वाचून वाचकांनी त्या भयानक आणि वेदनादायक जीवनाचा अनुभव घेऊन यायला हवं.'डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य समजून घेऊन अजून सुद्धा मस्तकात साचलेली 'जातीयवादाची'घाण फेकून द्यायला हवी व प्रत्येक माणसाला फक्त माणसाच्या दृष्टीकोनातून बघण्याची सवय लावायला हवी !
__________________________________________

9.कोण्या एका विद्यापीठात शिकून ,एखादी चांगली पदवी वगैरे घेऊन जेव्हा आपल्या स्वतःला मोठं समजून कोणी समोरच्याला छोटं समजतो,कमी लेखतो तेव्हा त्याचं मुळात घेतलेलं शिक्षण अनेक बाबतीत कुचकामी ठरतो.शिक्षण,वाचन तुम्हाला नम्रता शिकवतो.मोठा खऱ्या अर्थाने तोच असतो जो इतरांना छोटं समजतं नाही.इतरांचा आदर आणि मान आपल्याला राखता यायला हवं.

थोडा का असेना स्वाभिमान वगैरे प्रत्येकाला असतोच आणि तो असायलाच हवा.डिग्री मिळवण्याचा अर्थ आपण खूप भारी झालोय किंवा आपल्याला समोरच्या व्यक्तीला कमी समजण्याचा परवाना मिळतो असं होतं नाही !
__________________________________________

10.परिस्थिती पायी मोठी स्वप्ने बघायला माणसाने कधीही थांबवू नये.स्वतःला कधीही कोठेही आणि कोणापुढेही कमी समजू नये.न्यूनगंड वगैरे सुरुवातीला खूप येतो पण आपल्यातील उणिवा समजून घेऊन त्यावर वर्क करून आपण त्यावर सुद्धा मात करू शकतो.'आपल्याला हे जमणारच नाही'किंवा ये अपने बस की बात नहीं' असे ठरवूनच आपण जेव्हा एखादं काम करतो तेव्हा आपण त्यामध्ये अयशस्वीच होतो.

कारण आपलं स्वतःवरच विश्वास नसतो.इतरांच ऐकून,इतरांना बघून आपण स्वतःलाच कमी समजत असतो.इतरांशी तुलना करण्यात आपण स्वतःलाच ओळखण्यातच कमी पडतो.काहीही झालं तरीही माणसाने स्वतःला 'Underestimate' करायला नकोच.

मग काहीही होवो !
__________________________________________

11.आयुष्याच्या धावपळीत थोडं थांबायचं आणि त्या सर्वांना जमेल तसं वेळोवेळी 'Thank u आणि Love u म्हणायचं ज्यांना तुम्ही प्रेम करता, ज्यांच तुमच्या आयुष्यात खूप महत्वाचं स्थान आहे,ज्यांनी वेळोवेळी तुम्हाला कळतं नकळत काहीतरी दिलं आहे.मग ती साथ असो,प्रेरणा असो किंवा आशा.ही माणसे मग कोणीही असू शकतात.जवळ असतील तर प्रत्यक्ष भेटून मिठी मारून दूर असतील तर Msg किंवा कॉल करून पण माणसाने वेळोवेळी हे केलं पाहिजे.

आपल्या आयुष्यातील महत्वपूर्ण माणसांना त्यांचं महत्व कळवायला हवं.मनातील प्रेम व्यक्त करायला हवं.
चुकलं तर Sorry सुद्धा म्हणायला हवं !
__________________________________________

12.मला वाटतं आपण कोणालाही काहीही Explain करणे सोडून द्यायला हवं.चुकलं तर चुकी स्वीकारून पुढे चालतं राहायचं.चुकी न स्वीकारता तिची सारवासारव करणे हे व्यर्थ असतं.स्वतःला कोणापुढेही prove करण्यात अजिबात वेळ घालवायला नकोच.आपल्या आणि आपल्या पालकांच्या शिवाय आपल्याला कोणीही चांगलं ओळखत नसतं.त्यामुळे स्वतःच्या आणि आपल्या पालकांच्या नजरेत चांगलं राहायचं.बाकी इतर आपल्याबद्दल कोण काय विचार करतो या बाबतीत विचार करणे व्यर्थ असतं.'

शरद तांदळे सर म्हणतात :- "आपण स्वतःला काय समजतो, यापेक्षा आपला बाप आपल्याला काय समजतो हे जास्त महत्वाचं असतं."त्यामुळे आईवडिलांच्या नजरेत चांगलं राहायचं.

इतरांची मते तुमच्या परिस्थितीनुसार बदलत असतात.!
__________________________________________

13.2-4 वर्षांपासून कोणाबद्दलही मनात द्वेष बाळगला नाही किंवा कोणाचा वाईट व्हावं असा विचार सुद्धा मनाला स्पर्श करून गेला नाही.जसं जसं चांगली पुस्तके वाचत गेलो,जातोय तसं तसं ऑटोमॅटिकली 'माणुसकीकडे' ओढल्या गेलो आणि जातोय.वाईट वगैरे विचार पूर्वी मनात येऊन  गेले,वाईट वागायचं प्रयत्न सुद्धा अनेक वेळा केलं पण काही जमलं नाही.

द्वेषासाठी आपण बनलो नाही कदाचित हा विचार करून सोडून दिलं.'कोणाबद्दलही खरंच सांगतो कोणाबद्दलही माझ्या मनात सध्या कोणताही गैरसमज किंवा द्वेष नाही.काही गैरसमजुतीने रागावले असतील किंवा जाणून बुजून पण मी समोरून कधीही कोणालाही दुखवण्याचा प्रयत्न अजिबात केलं नाही.

जेवढं होईल आजपर्यंत तेवढं चांगलंच वागलोय प्रत्येकासोबत बहुतेक त्यामुळेच एवढा मोठा मित्र परिवार कमावलं आणि कमावतोय.ज्यांना सुद्धा भेटतो,बोलतो एकदम हृदयाने मनापासून भेटत ,बोलत असतो.चुकीचे गैरसमज आणि विचार मनात येत नाही इथपर्यंत आता आलोय.

सोशल मीडियावर आतापर्यंत काही जणांसोबत गैरसमज झाले असतील,पुढे होतील पण ते फक्त सोशल मीडिया पूर्तच मर्यादित राहतील एवढं नक्की..कधीही गैरसमज झाले किंवा माझ्या वागण्यात तफावत आढळली तर नक्की सांगत जा बोलत जा.

मला माणसं जोडायची आहे तोडायची अजिबात नाही..♥️
__________________________________________

14.कोणाबद्दल आता मनात काहीही असेल तर ते विसरून जायला हवे.कोणाला काहीही बोलायचं असल्यास तर ते सरळ सरळ सांगून द्यायला हवं.एखाद्या बद्दल मनात असलेल्या चुकीच्या समजुती, द्वेष,ईर्ष्या वगैरे जमलं तर काढून फेकून द्यायला हव्या किंवा बोलून त्या Sort out करायला हव्या.कोविड पासून सर्वकाही चेंज झालं आहे.काहीच भरवसा राहिलेला नाही.या काळात असंख्य जणांना फार जवळून जाताना बघितलं आहे..Life Is So Unpredictable..कधीपर्यंत चुका वगैरे धरून बसायच्या..माणूस नसला तर त्याच्या या चुका,उणिवा काय कामाच्या ?बोलून मोकळं व्हायला हवं आज,उद्या करता करता फार उशीर होऊन जातो आणि शेवटी उरतो तो फक्त पश्चाताप 🖤
__________________________________________

15.Idea नाही समोरचा व्यक्ती Genuine असेल किंवा नसेल...तो/ती मतलबी,स्वार्थी सुद्धा असू शकतो.होऊ शकतं तो/ती कामापूर्तचं नातं जपतं असेल..जेवढं तुम्ही त्याला/तिला देता तुम्हांला तेवढं अपेक्षेप्रमाणे परत मिळतं सुद्धा नसेल मग ते प्रेम असो किंवा काळजी.तुम्ही तुमचं बेस्ट देता पण समोरून बेस्ट येत नाही असं कधीकधी वाटून जातं. But मला वाटतं असं काहीही असेल तरीही आपण आपली सेल्फ रिस्पेक्ट जपून शक्य होईल तेवढं प्रेम द्यायला हवं,काळजी करायला हवी.निस्वार्थी भावनेने कुठल्याही परतीच्या अपेक्षशिवाय केलेलं प्रेमाला मी जास्त प्राधान्य देतो. 

कोणतंही नातं जपताना तो असं जपायचं की जेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला कुठल्याही कारणाने सोडून जाईल तेव्हा त्याला/तिला तुमची पावलोपावली आठवण येत राहील. कारण या स्वार्थी जगात नाते बनवणारे,मानणारे खूप मिळतील पण नाती खऱ्या अर्थाने जपणारे /निभावणारे खूप कमी मिळतील.नात्यात मग तो प्रेम असो किंवा मैत्री मोठ्या मोठ्या बाता मारणारे असंख्य असतात पण काहीही झालं तरीही हे नाते जीवापाड जपणारे दुर्मिळच असतात....♥️#बस्स आपला हाच रुल आहे.
__________________________________________

16.मला माहिती नाही.कोण आपल्याबद्दल काय आणि कसा विचार करतो ?वाईट अथवा चांगल.मुळात याने आपल्याला काही फरक पडत नाही आणि पडायला सुद्धा नको.मत बनवणारी माणसं असंख्य असतात.ती तुम्हाला भेटल्याशिवाय सुद्धा तुमच्याबद्दल एक विशेष मत बनवून मोकळी होतात.एखाद्याला तुम्हाला वाईटच समजायचंच असेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीही तो तुमचं द्वेषच करणार,तुम्हाला वाईटच समजणार.कारण दृष्टीचा इलाज आहे दृष्टीकोनाचा नाही.त्यामुळे तुम्हाला जी माणसं ओळखतात,मानतात त्यांना जास्त महत्व द्या.गर्दीच्या मागे लागू नका.वेळेनुसार येणारे येतील आणि जातील.पण जे तुम्हाला समजून घेतात ती कायम तुमच्यासोबत राहतील..यामुळे 'गये तो गम नहीं अपने पास कम नहीं'💕 __________________________________________

17.अत्त दीप भव' चा अर्थ मला आज नव्याने समजला,उमजला....स्वतःचा प्रकाश स्वतःच बनायला हवं.इतर कोणाकडूनही कोणतीच अपेक्षा अजिबात ठेवायलाच नको.स्वतःचा मार्ग स्वतःबनवुन चालायला हवं.आपल्या वाटा, लक्ष्य प्रकाशमान करण्यासाठी आपणच आपली दिशा शोधायची असते. अशी दिशा कुणी आपल्याला दाखविली तर ती केवळ आपलीच असेल असेही नाही. आपल्यामुळे आपला अवतीभवतीचा परिसर उजळून निघेल, असं स्वयंप्रकाशित आपल्याला व्हायचं असेल तर त्यासाठी आपलं स्वयंप्रकाशित होणं अस्सल हवं. या गोष्टीचं ज्ञान मला समजलं पूर्वीच होतं पण आज उमजलं..🌱
__________________________________________

18.कुठलाही नातं मग तो प्रेमाचं असो,मैत्रीचं असो किंवा भाऊ बहिणीचं ते एकदम डायरेक्ट दिलसे जपण्याला मी कायम प्राधान्य देत असतो/आलोय...आयुष्यात हवे तसे नातेवाईक मिळाले नाहीत किंवा त्यांचा प्रेम/आपुलकी मिळाली नसल्याने मला नातेवाईकांत अजिबात इंटरेस्ट नव्हता आणि नाही..मुळात मला कोणीही नातेवाईक नाही असंच मी मानतो.रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचं नातं मला कायम महत्वाचं आणि जवळच वाटतं असतं नेहमीच.आणि मी अशी हक्काची माणसं जोडण्यात सुद्धा कमालीचं यशस्वी झालोय,होतोय...एक वेगळीच नाळ माझी असंख्यासोबत जुडली आणि जुडत आहे.एकंदरीत ही नाळ अजूनही घट्ट जुडणार आहे.हा माणुसकीचं नातं मला मनापासून जपायचं आणि निभवायचं आहे.♥️
__________________________________________

19.आपण खूप वैचारिक, Mature आहोत हे नेहमी दाखवणे जरुरी नसते....कधीकधी Immature सुद्धा वागून बघायला हवे.लहान मुलांसारख मनसोक्त जगून बघायला हवे.आयुष्य खरंच खूप सुंदर आहे फक्त त्याचा मनसोक्त आनंद आपल्याला घेता यायला हवं.छोट्या छोट्या गोष्टीत आपलं आनंद शोधून आपण जगून बघायला हवे...कधी बाळबोध सुद्धा वागायला हवं.तर जेव्हा आपल्याला कोणी म्हणतो की काय लहान मुलांसारख वागतोय/करतोय. तेव्हा आपण त्याला तुम्ही सुद्धा वागून बघा भारी वाटतं असं म्हणायला हवं....काहीही झालं तरीही स्वतःमधील बालपण हरवू देऊ नये..💕
__________________________________________

20.जैसे को तैसा' वगैरे ही भावना अनेक वेळा मनात येते.But हे फक्त म्हणायला,बोलायला सोपे असते.तसं वागता अजिबात येतंच नाही..एखाद्याने चुकीची वागणूक दिली किंवा आपलं द्वेष केलं तर आपण सुद्धा त्याचा द्वेष करायचं,हीन वागणूक द्यायची वगैरे असं मनात येऊन जातं... पण आपल्याला ते काही जमतं नाही आणि जमणार नाही...कोणीही कितीही कठोर वागला तरीही आपली काही तशी वागायची हिम्मत होतं नाही हेच खरं.एखाद्याच्या स्मिताने सर्व राग बाजूला ठेवणारी,एखाद्याच्या डोळ्यांत पाणी बघून आपल्या सुद्धा डोळ्यांत टचकन पाणी येऊन जातं.अशी माणसं आपण,इतरांच्या वेदना आपल्याला नकळतपणे जाणवतात,फील होतात,आपण काय कुणाचा द्वेष करणार ?कुठल्याही बाबतीत कधीही नाही.नाही अजिबात नाही कधीही नाहीच ♥️

To Be Continued.....💕🌱

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼