सत्तांतर💜
व्यकंटेश माडगूळकरांचा मी चाहता बनगरवाडी पासूनच झालो होतो.बनगरवाडी जेव्हा सर्वप्रथम वाचली होती तेव्हापासून त्यांचा लिखाण मला प्रचंड भावून गेला..बनगरवाडी कादंबरीत ज्याप्रकारे त्यांनी एक सुंदर विश्व निर्माण केला होता तेव्हापासून मी माडगूळकरांनी लिहलेल्या सर्वच पुस्तकांचा शोध घ्यायला सुरूवात केली आणि ती सर्वंच पुस्तके खरेदी केली..तर अशाप्रकारे बनगरवाडी नंतर माडगूळकर सरांचं मी वाचलेलं दुसरं पुस्तक सत्तांतर हे होय..सत्तांतर मी २ वेळा वाचलं आणि दोन्ही वेळा काही नवीन अर्थ उमजले/समजले.
प्रत्येकानी एकदा तरी वाचावं असं एक छोटेखानी पुस्तक आहे..माकडांचे विश्व आणि त्यांच्यात चालणारा सत्तेसाठी चालणारा संघर्ष हा या पुस्तकाचा गाभा आहे.माकडांचे निरीक्षण ज्याप्रकारे लेखकांनी केले ते अक्षरशः आपल्याला ते क्षण जगवतात.पुस्तकातील रेखाटलेले माकडाचे चित्र सुद्धा अफलातून आहे.
काळाप्रमाणेच संघर्षही सतत वाहतच असतो. त्याला खंड असा नसतोच. असलीच, तर भरती असते, पूर असतो. जेव्हा जेव्हा खाणारी तोंडं भरमसाट वाढतात, गर्दी होते. तेव्हा तेव्हा संघर्ष बळावून उठतो. जेव्हा उपलब्ध अन्नात, भूमीत वाटेकरी निर्माण होतात, तेव्हा संघर्ष उचल खातो. जेव्हा अस्थिरता निर्माण होते, एखादी जात धोक्यात येते, बाहेरून परकं कोणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पाहतं. तेव्हा संघर्ष उतू जातो..ज्यांना बोलता येतं, ते हा राग, उद्दामपणा, संघर्ष शब्दांतून दाखवतात. ज्यांना बोलता येत नाही, त्यांचे राग-लोभ प्रेम हावभावांतून, स्पर्शातूनच सांगितले जातात...संघर्ष पेटला, की शस्त्रास्त्रं वापरली जातात ज्याना शस्त्रास्त्र माहीतच नसतात, ते सुळे, नख वापरतात. संघर्ष सर्वत्र भरून राहिलेला असतो..
सत्तांतर ही कथा आहे एका मुडा नावाच्या वानराची व त्याच्या टोळीची आणि त्यांच्यामधील होणाऱ्या सत्ता परिवर्तनाची किंवा संघर्षाची ..आपल्या अधिपत्य गाजवण्यासाठी होणाऱ्या धडपडीची..
पुस्तकातील वानराची प्रजाती/जात 'हनुमान लंगुर'ही आहे.
लेखकांनी अश्या प्रकारे ही कथा आपल्यासमोर ठेवली आहे जी आपल्याला ते दृश्य अगदी आपल्या डोळ्यासमोर दिसतात.पुस्तकामधील वानरांना त्यांच्या स्वभाव शरीर वैशिष्ट्यांनुसारच लेखकांनी नावे दिली आहे.लेखकांनी प्रत्येक वानराचे खूपच चांगल्याप्रकारे वर्णन केले आहे..मुडा,उनाडी, लांडी ,तरणी, थोटी, लाजरी,बोकांडी,काणी, बोथरी, लालबुड्या,मोगा,जाडी इत्यादी वानरांची नावे आपल्या ध्यानात राहतात व आपण त्यांच्या प्रेमात पडतो..या छोट्याशा पुस्तकामध्ये आपण रमून जातो व पुढे काय होते याची सारखी उत्सुकता आपल्याला राहते.हे पुस्तक वाचत असताना काही प्रसंग,वर्णन वाचत असताना मनाला एकंदरीत दुःख होतो उदा :- बोथरी रान कुत्र्याच्या जबड्यात सापडते तेव्हा,लालबुड्याला सर्प चावतो व तो हाल हाल होऊन मरतो तेव्हा,मुडा लढून हारतो व मरतो तेव्हा,लांडी आपल्या मेलेल्या मुलाला ४ दिवस घेऊन फिरते तेव्हा इत्यादी काही प्रसंगी आपले डोळे आपसूकच ओले होतात..ताकदीच्या जोरावर चालणारा हा सत्तांतराचा खेळ आपल्याला समाजात सुद्धा चालताना दिसतो.फरक फक्त एवढाच की मानवाचा खेळ हा स्वार्थी असून माकडांचा खेळ स्वार्थी नसून आपल्या टोळीला सोबत घेऊन चालणारा आहे.कालचक्राप्रमाणे हा खेळ सुद्धा शेवटपर्यंत चालत राहणारा आहे..आपल्याला आयुष्यातील काही गोष्टीं खरंच किती विचित्र आणि भयानक असतात याची प्रचिती आपल्याला सत्तांतर वाचत असताना येते..
या पुस्तकाबद्दल लिहायला खूप काही आहे पण येथे वाचल्यापेक्षा ते तुम्ही पुस्तकांतच वाचून अनुभवावे...
©️ Moin Humanist ✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा